निमगाव डाकू भ्रष्टाचार प्रकरणाचा ‘कारवाईचा खेळ’! वसुलीचे आदेश, शिस्तभंगाचे निर्देश; तरी गटविकास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ? — सागर गिरे
कर्जत (प्रतिनिधी ऋषभ परदेशी* – राशीन तालुक्यातील निमगाव डाकू ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते सागर मुरलीधर गिरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या ग्रामपंचायत विभागाने चौकशी अहवालाच्या आधारे संबंधित ग्रामपंचायत अधिकारी, शाखा अभियंता आणि उपअभियंता यांच्याकडून समप्रमाणात रक्कम वसूल करण्याचे आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
माहिती अधिकार कार्यकर्ते सागर गिरे यांनी दि. २८.०७.२०२५ आणि ०३.१०.२०२५ रोजी तक्रार अर्ज दाखल करून निमगाव डाकू येथील विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यावर जिल्हा परिषदेने गटविकास अधिकारी, पंचायत समिती जामखेड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती.
चौकशीत दोन गंभीर बाबी उघड झाल्या:
१) वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना (२०१७-१८): जाधव वस्ती ते गिरी वस्ती अंतर्गत रस्ता तयार करण्याचे काम मंजूर असताना, प्रशासकीय मान्यतेतील अटी व शर्तींचे उल्लंघन करून मंजूर ठिकाणी काम न करता दुसरीकडेच काम दाखवण्यात आले. या कामावर झालेला संपूर्ण खर्च रु. ४,८१,९९१/- जबाबदार तत्कालीन/विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी, शाखा अभियंता आणि उपअभियंता यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
२) गावठाण भूमिगत गटार: या कामावर रु. २,९५,०००/- खर्च दाखवण्यात आला असून, प्रत्यक्ष मूल्यांकन रु. २,५०,१५९/- इतके झाले आहे. म्हणजे रु. ४४,८४१/- जास्त खर्च दाखवण्यात आला आहे.
वारंवार आंदोलने, प्रशासनाकडून दुर्लक्ष
सागर गिरे यांनी यापूर्वी दि. ०८/०९/२०२४ रोजी उपोषण, दि. १५/०८/२०२४ आणि ११/०८/२०२५ रोजी आंदोलन, तसेच १३/१०/२०२५ रोजी ४ दिवस उपोषण केले होते. प्रत्येकवेळी १० ते १५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप गिरे यांनी केला आहे.
अखेर दि. ०१/०९/२०२६ रोजी गिरे यांनी जिल्हा परिषदेसमोर दि. ११/०९/२०२६ पासून अर्धनग्न अवस्थेत थाळी वाजवून बेमुदत आंदोलन आणि गटविकास अधिकारी यांचा पुतळा घेऊन फिरण्याचा इशारा दिला होता.
या इशाऱ्याची गंभीर दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी गटविकास अधिकारी, पं.स. कर्जत यांना तातडीने वसुली आणि शिस्तभंगाचा प्रस्ताव सादर करण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनालाही माहिती देण्यात आली आहे.
> “प्रशासन नेहमीच कोणाला तरी पाठीशी घालत आहे. माझ्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास जिल्हा परिषद आणि गटविकास अधिकारी जबाबदार राहतील,” असा इशारा सागर गिरे यांनी दिला आहे.
🔴 निमगाव डाकू भ्रष्टाचाराला चाप!
माहिती अधिकार कार्यकर्ते सागर गिरे यांच्या लढ्याला यश. जि.प. अहिल्यानगरचे आदेश – रस्ता आणि गटार कामातील ५ लाख २६ हजारांचा भ्रष्टाचार मान्य, संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांकडून वसुली होणार.
११ सप्टेंबरच्या अर्धनग्न थाळी आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे!








