🌾 शेतरस्त्यांसाठीच्या कार्याची जिल्हा प्रशासनाकडून दखल
अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या हस्ते दादासाहेब जंगले पाटील यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान
घोगरगाव | प्रतिनिधी सागर शेळके
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सातत्याने केलेल्या कार्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या हस्ते चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून शेतकऱ्यांच्या हक्काच्या शेतरस्त्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या चळवळीच्या कार्याची प्रशासकीय पातळीवर घेतलेली दखल असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या भेटीदरम्यान ‘श्रीगोंदा पॅटर्न’च्या धर्तीवर जिल्ह्यातील शेतरस्ते व शिव-पाणंद रस्त्यांच्या प्रश्नांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. प्रत्येक तालुक्यात विशेष मोजणी अधिकारी उपलब्ध करून देणे, शिव-पाणंद रस्त्यांची मोजणी व सीमांकन गतिमान करणे, तसेच तहसीलदार व प्रांताधिकारी स्तरावरील प्रलंबित शेत-वहिवाट रस्त्यांची प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याबाबत चर्चा करण्यात आली.
महसूल व भूमी अभिलेख विभागामध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून प्रत्यक्ष स्थळावर कार्यवाही करण्यावरही भर देण्यात आला. तसेच महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर संमती व तडजोडीने जलदगतीने निकाली काढण्यासाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राबविण्याबाबत सकारात्मक पुढाकार घेण्याची भूमिका व्यक्त करण्यात आली.
शेतरस्त्यांची मोजणी, सीमांकन आणि प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर आवश्यक ते सहकार्य व समन्वय देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
“शासनाचा निर्णय केवळ कागदावर न राहता तो शेतकऱ्याच्या बांधावर प्रत्यक्ष दिसला पाहिजे,” या भूमिकेतून श्रीगोंदा तालुक्यातील अनुभव जिल्ह्यातील इतर तालुक्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे दादासाहेब जंगले पाटील यांनी सांगितले.








