आला रे आला… गणपती बाप्पा आला!
गणेशाच्या जयघोषाने राशीनची बाजारपेठ दुमदुमली; बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाकडे साकडे
राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी :
“गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया!” या जयघोषाने राशीन नगरी भक्तिमय झाली आहे. लहान मुलांची किलबिल, ढोल-ताशांचा गजर आणि उत्साहात गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या छोटे-मोठे गणेश मंडळांमुळे सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
राशीन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चिंचेच्या झाडाखालील व्यापारी पेठ गणरायाच्या आगमनाने अक्षरशः फुलून गेली आहे. गणेशमूर्ती, फुले, हार-तुरे, मखर, तोरणे, सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाई व पूजासाहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. ग्राहकांची वाढलेली वर्दळ असल्याने व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
गणेशोत्सवानिमित्त मिठाईच्या दुकानांमध्येही मोठी लगबग सुरू असून मोदक, पेढे, लाडू यांसह विविध मिठाईच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवामुळे राशीनच्या बाजारपेठेला आर्थिक चालना मिळत आहे.
दरम्यान, गणरायाच्या चरणी यंदा बळीराजासाठी भरपूर पावसाचे साकडे घातले जात आहे. शेतशिवार हिरवेगार होऊ दे, पावसाने कृपा करावी, दुष्काळाचे सावट दूर जावे आणि शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी मनोभावे प्रार्थना गणेशभक्तांकडून केली जात आहे.
ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पाचा जयघोष आणि भक्तांच्या उत्साहाने राशीनमध्ये गणरायाचे आगमन जल्लोषात झाले असून, संपूर्ण नगरीत भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.








